डोळ्यांनेही होतो बलात्कार

डोळ्यांनेही होतो बलात्कार

हैद्राबाद शहरातील एक कुटुंब आज अतिशय वाईट प्रसंगातून जात आहे. डॉ. प्रियंका रेड्डी सोबत घडलेल्या घटनेवर सर्व स्तरावरून निषेध होत आहे. समाजातील काही मंडळी जाहीर निषेध करत आहे, काही मंडळी हळहळ व्यक्त करत आहे. तर, काही महाभाग स्त्रियांनी कसं वागावे, कसे राहावे, यावर उपदेश देत आहेत. आज दर पंधरा मिनिटाला एका ‘स्त्री’वर बलात्कार होत असल्याचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. मग ते माणसांनी गजबजलेले ठिकाण असो, वा निर्जन स्थळ, बळी तर ‘स्री’चाच जातो आहे.
हैद्राबाद मधील घटनेचा तपास व कारवाई पोलिसयंत्रणा करत आहे. खुद्द आरोपीची आई ‘मुलास फाशीवर द्या’ म्हणत आहे. असे अमानवीय कृत्य करणाऱ्या विकृत आरोपीना काय शिक्षा द्यावी? ही न्यायव्यवस्थेची जबाबदारी आहे. पण तुम्ही आम्ही यात काय महत्वाची भूमिका घ्यावी? कारण, फक्त वाॅट्स अॅप, फेसबुक स्टेटस ठेवून होणार नसून अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी प्रदीर्घ प्रक्रीया करावी लागणार आहे.
आत्तापर्यत आपण फक्त जे घडल त्यावर बोलतो आहे. पुढे हे घडणार नाही याचे कारण व उपाय शोधणे गरजेचे आहे. आता हे सरकारचे व पोलिसांचे काम आहे, असं म्हणून आपली जबाबदारी दुसऱ्सांवर ढकलल्यासारखे होईल.
ही विकृती बळावण्याच सर्वात मोठं व महत्वाच कारण म्हणजे इंटरनेटवरील अश्लील व्हीडीओ, वेब सीरीज मधील बेलगाम अश्लीलता आणि आजच्या काळातील काही सिनेमांमध्ये सर्रास दाखवले जाणारे बोल्ड सीन. पूर्वी सिनेमात दोन गुलाब जवळ-जवळ आणून सीनचा मतितार्थ सांगायचे, आता मात्र सगळ उघडपणे दाखवल्या जाते. कशाला ओ! राहू द्या ना काही गोष्टी आतच. बाॅक्स आॅफीसवर यांचा गल्ला कोटीच्या घरात जातो. पण, हेच बघणाऱ्या विकृत लोकांमुळे स्रीयांचा बळी जातो. आपण सतत एखादी गोष्ट बघितली की तसचं करण्याची इच्छा मन करते. आपण काय बघाव? ते चांगल का वाईट, हे कळेपर्यत विकृती विकोपाला जावून नाबालीक मुले सुध्दा हा अपराध करतात. बरेचदा याची सुरुवात परिचीत मुलींना स्पर्श करून बघण्यापासून होते. हळूहळू यांची अनोळखी महिलांवर जबरदस्ती करण्यावर हिम्मत होते. तर, काही माणसांचा ‘स्री’कडे बघण्याचा दृष्टीकोणच पूर्ण चूकीचा असतो. कारण, डोळ्यांनी केलेला बलात्कार दिसत नाही. जो पर्यत दृष्टीकोण बदलत नाही तोवर हे थांबणे शक्य नाही.
उपायाच्या दृष्टीने विचार करता, प्रत्येक घरात आई-वडीलांनी आपल्या पाल्यांसोबत बिनधास्तपणे संवाद साधण्याची गरज आहे. मुलांसोबत प्रत्येक विषयावर संवाद साधल्यावर त्यांच्या विचारांचा मार्ग कुठे जात आहे, हे लक्षात येईल. संवाद साधला की प्रश्न निर्माण होतात आणि प्रश्नाना योग्य उत्तर मिळाले की चांगला मार्ग मिळतो. कुठल्याही परीस्थितीत अडकले असता पहीला काॅल घरी न करता १०० किंवा महिला हेल्पलाईन १०९१ ह्या क्रमांकाला लावल्यास नक्कीच मदत मिळते, असे प्रत्येकाने आपल्या घरातील लहान मुली व महिलांना सांगा.
मुलगा हा वंशाचा दिवा आणि तो ‘मुलगा’ आहे म्हणून शक्यतो घरची मंडळी मुलींच्या तुलनेत त्यांना प्रश्न किंवा जाब विचारत नाही. तो काय करतो, कुठे जातो हे विचारने सहसा पालक टाळतात. या सोबतच आपला मुलगा काय विचार करतो? हे तपासून बघणे महत्वाचे आहे. शाळा, काॅलेजमध्ये लैंगिक शिक्षण दिल्या जाते. तसेच, विकृतीला आळा बसावा व मन स्थिर राहण्यासाठी योगाभ्यास सक्तीचे करावे, त्याने मुलांमधील क्रोध, द्वेश, राग, विभत्स विचारांना सात्विक विचाराकडे वळवण्यास मदत होईल. आपल्या देशात ‘योगा’ला काहीच महत्व नाही, ही शोकांतीका आहे. पण ही काळाची गरज आहे. आणि यांची सुरूवात आत्ताच व आपल्यापासून केली तरच बदल घडेल. अन्यथा मुलींना घराबाहेर पडतांना हाती तलवार, चाकू घेवून निघायची ती वेळ दूर नाही….

– पल्लवी प्रकाश

पल्लवी प्रकाश चिकारे

पल्लवी प्रकाश चिकारे, नागपूर. पत्रकार, सामाजिक विषयाच्या अभ्यासक.

Comments (0)
Add Comment