प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आज दिवे लावायचे का ?

लढा कोरोना विषाणू विरोधातला.

मननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आज दिवे लावायचे का ?

आजच्या दिवशी दिवे लावणे किती तार्कीक आहे ? त्यामागे काय लॉजिक आहे असा प्रश्न अनेक लोक विचार आहेत.
आज देशाचे प्रमुख म्हणून श्री नरेंद्र मोदी आपल्याला जे जे काही सामुहीक कृती करायला सांगत आहेत ते सर्व करणे आपल्या देशाच्या, समाजाच्या आणि स्वत:च्या फायद्याचेच आहे. हे लक्षात घेताना सोबतच आपल्या एवढ्यामोठ्या खंडप्राय देशाचा आवाका आणि विस्तार लक्षात घेतल्यावर आणि हा विस्तार व आवाका संदर्भ म्हणून मागे ठेवल्यावर आपल्याला त्यांचे शब्द व त्यांची हे किंवा असे काही करण्याची प्रेरणा लक्षात घेणे अवघड जाणार नाही.
एखाद्या मोठ्या कामात खुप मोठ्याप्रमाणात जनसमुदाय सहभागी करून घ्यायचा असल्यास त्या सर्व जनसमुदायाकडून एखादे ठराविक काम करून घेणे किंवा न करून घेणे यासाठी नेत्याला खुप मोठी कसरत करावी लागते. कारण जनसमुदाय जर मोठा असेल तर त्यांच्यात विविधता वाढते. वय, लिंग, भाषा, शैक्षणिक, सामाजिक समज, आर्थीक स्तर, समाजात मिसळून काम करण्याची क्षमता अश्या अनेक पातळीवर समाज भिन्न भिन्न प्रकारे व्यक्त होत असतो. अश्यावेळी उत्तम नेता तोच असतो जो या सर्व भिन्नतांनी भरपुर असलेल्या समाजातून एक लसावी (लघुत्तम सामाईक विभाजक) शोधून काढेल व एका साध्या मात्र समान कृतीने समाजातील सर्वच स्तर एकसंध बांधेल. यामुळे समाजातील सर्वांनाच व्यक्त होता येते व सहभागी होता येते. प्रत्यक्षात समाजातील सर्वच लोकांचा सहभाग खुप मोलाची भर टाकतो असे नसते मात्र ज्या कारणासाठी किंवा ज्या हेतूसाठी समाजाचा नेता एखादी चळवळ उभी करतो ती चळवळ किंवा ते धेय्यं या छोट्या कृतीमुळे सगळ्या समाजाला आपलेसे नव्हे आपले स्वत:चे वाटते. त्यात जनसहभाग वाढतो आणि शेवटी ती चळवळ सफ़ल होते. ती कृती किंवा ती चळवळ त्या क्षणी शुल्लक, हास्यास्पद किंवा अतार्कीक जरी वाटत असली तरी जरा न्याहाळून पाहिले असता त्या कृती मागे बहुतांश जनता काहीतरी कृती करून अपला सहभाग नोंदवू शकते अशी अपेक्षा असते. व असे केल्याने तो जनसमुदाय त्या चळवळीशी भावनिकदृष्ट्या जोडला जातो. ती चळवळ जनतेची चळवळ होते व धेय्य साध्य होते.
या विषयीचं एक खुपच प्रभावी व आपल्या सर्वांना माहिती असलेलं उदाहरण बघुया. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात मोठे नेते म्हणजे महात्मा गांधी. सुमारे 90 वर्षांपुर्वी म्हणजे 1930 साली त्यांनी ‘सविनय कायदेभंगा’ची चळवळ सुरू केली. आता त्याकाळी ही चळवळ लोकांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांना या चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रेरीत करणे यासाठी गांधीजींनी एक कार्यक्रम आखला. त्यांनी 12 मार्च 1930 रोजी आपल्या साबरमतीच्या आश्रमातून केवळ 80 लोक घेऊन सुमारे 390 किमी अंतरावर असलेल्या दांडी येथे समुद्रकिना-यावर जाऊन ब्रिटीश कायद्याला मोडून मुठभर मिठ उचलून कायदेभंग करण्याचे ठरवले. आता याकडे तार्कीक किंवा आजच्या भाषेत लॉजीकल दृष्टीने पाहिले तर यात काहीच अर्थ वाटत नाही. 390 किमी चालायचं आणि काय करायचं तर एक मुठ मिठ उचलायचं. ब्रिटीश सरकारनेसुध्दा सुरूवातीला या दांडी यात्रेकडे दुर्लक्ष केले. मात्र ही यात्रा जसजशी समोर जात गेली तस तसे लोक या यात्रेत सहभागी होत गेले. जगभरातून या यात्रेकडे लोक आकर्षीत झाले. अहिंसक आंदोलन, पदयात्रा आणि केवळ मुठभर मिठ उचलण्याचा कार्यक्रम. मात्र हजारो लोक या यात्रेत सहभागी झाले. तुम्ही कुठल्याही स्तरातील असा, उच्च शिक्षीत, शेतकरी, कामगार, सवर्ण , बहुजन अगदी कुणीही असाल तरी या साध्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी होऊ शकता आणि देशासाठी आपलं बहुमोल असे योगदान देऊ शकता. आणि हो हे फार महत्वाचे योगदान आहे. हे सगळं त्या काळात गांधीजींनी देशातील जनतेला पटवू दिलं आणि त्याचे फलीत आपल्या समोर आले ते एका मोठ्या जनचळवळीच्या स्वरूपात. जेव्हा 24 दिवसांनंतर गांधीजी दांडी येथे पोहोचले तेव्हा पन्नास हजार पेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते. जगातील सर्वच महत्वाच्या न्युजपेपरनी या दांडी यात्रेची दखल घेतली होती. जगभरात भारताच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय लोकांचे अहिंसंक मार्गाने चाललेले आंदोलन अशी दखल घेतली. आणि भारताच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट अशी की भारतीय जनतेला या चळवळीच्या माध्यमातून गांधीजींनी एक छोटा मात्र प्रभावी कार्यक्रम दिला. ज्याने देशातील नागरीक प्रत्यक्ष या लढ्यात सहभागी होऊ शकतील. कार्यक्रम काय होता ? तर ठरवून ब्रिटीशांचा कायदा अहिंसक मार्गाने मोडायचा. हे सहज होते, प्रत्येक जण आपआपल्या गावी, खेड्यात , गावात हे करू शकत होता. या अश्या कार्यक्रमामुळे स्वातंत्र्यप्राप्तीची चळवळ जी आधी केवळ उच्चशिक्षीत लोकांची होती ती चळवळ गांधीजींनी भारतातील जनसामान्याची करून दाखवली.
वरील उदाहरणावरून असे सांगता येईल की दांडी यात्रेत एवढे किलोमीटर चालत जाऊन मुठभर नीट उचलून जे साधले गेलं ते ज्या दिवे लावण्याने साधले जाणार आहे. देश पातळीवरील नेते किंवा भारतासारख्या खंडप्राय देशातील नेते जेव्हा एखादा कार्यक्रम जनतेला देतात तेव्हा तो बहुतांश जनतेच्या सहभागाच्या कार्यक्रम असावा लागतो जेणेकरून समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना त्यांचा सहभाग देता येईल व प्रत्येकाला आपल्या योगदानाचे समाधान मिळेल. असे कार्यक्रम किंवा अशी सामूहिक कृती जेव्हा एखाद्या नेत्याकडून समाजाला दिल्या जाते तेव्हा त्यातील कृती किंवा त्यातील करावयाची गोष्ट महत्त्वाची नसून त्यामागे एक समान विचार घेऊन एक समान कृती करण्याचा प्रयत्न असतो.

यामुळे एवढ्या मोठ्या देशातील एवढी मोठी लोकसंख्या आपल्यातील सगळे भेद विसरून, आपल्यातील सगळे वेगळेपण बाजूला ठेवून एका विचाराने, एका भावनेने, एकत्र येऊन एक छोटीशी कृती करतात. त्या छोट्या कृतीचे प्रत्यक्ष व्यवहारात उपयोजन काही नसेलही, मात्र देशातील जनतेला भावनेच्या आणि विचाराच्या एका समान पातळीवर आणणे व एखाद्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी एक समान विचार पेरणे, ही महत्वाची कृती, ही महत्त्वाची जबाबदारी, ही महत्त्वाची घटना याद्वारे साधल्या जाते. त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात इंग्रजी कायदा हा जाणीवपूर्वक तोडणे आणि त्याला सविनय कायदेभंग म्हणेने असा जो कार्यक्रम गांधीजींनी दिला होता त्यात करावयाची कृती फार छोटी होती मूठभर मीठ उचलले किंवा जंगलात प्रवेश करणे किंवा एखादा कायदा जाणीवपुर्वक सविनय तोडणे असा तो प्रकार होता मात्र त्यातून तयार झालेली जनजागृती, आपण स्वतंत्र व्हावे अशी उर्मी आणि आपण या मोठ्या कामात सहभाग घेऊ शकतो ही जाणीव व त्यामुळे मिळालेले समाधान हे फार मोलाचं होतं.
अश्याच मोठ्या संकटाला जेव्हा देश म्हणून आपण सामोरे जातोय, त्यावेळेस देशातील सर्वच नागरिक जे कुठल्याही पातळीवर असोत, आर्थिक, सामाजिक, राजकीय, भौतिक, भौगोलिक वेगळेपण असलेल्या सर्वांनी एकत्र येऊन एका विशिष्ट वेळी एक विशिष्ट कृती करणे, यातून जो एकसंधतेचा भाव निर्माण होईल व एक वाक्यता समाजात तयार होईल, त्या एक वाक्यतेची, एका विचाराची आज भारताला खूप जास्त गरज आहे. त्यामुळे दिवे लावून कोरोना नष्ट होईल का ? नाही असा प्रश्न विचारणेच चुकीचे आहे. हा उपक्रम कोरोणासाठी नसून जनतेसाठी आहे. जनतेने दिलेल्या कार्यक्रम आपला म्हणून राबवावा व कितीही कंटाळा आला घरात बसण्याचा तरी आपण घरात बसून देशासाठी एक मोठे योगदान देतोय याची त्यांना खात्री व्हावी यासाठी हा उपक्रम आहे. एका वेळेस भारतभर दिवे लावण्याचा हा जो प्रकार आहे तो भारतातील बहुतांश जनतेला करणे सहज शक्य आहे आणि तसं करून सगळा भारतीय समाज जाणिवेच्या आणि विचारांच्या एका समान पातळीवर येतो. आपल्याला या कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करायचा आहे. आपण एकटे नसून कोट्यावधी भारतीय आपल्या सोबत आहेत. ही भावना लोकांच्या मनात तयार झाली तर लोकांची वागणूक जास्त जबाबदारीची व जाणीवपूर्वक होईल अशी त्यामागची अपेक्षा आहे.

नुसते हर हर महादेव ची गगनभेदी घोषणा देऊन स्वराज्य निर्माण झालं असत का ? तर नाही पण मनमानत स्फुल्लिंग पेटले.

मूठ भर मीठ हातात घेऊन स्वातंत्र्य मिळणार होत का ? तर नाही पण या छोट्याश्या कृतीने  मनमानत देश स्वातंत्र्याची धग निर्माण झाली.

स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे असे म्हणून कोणी स्वराज्य झोळीत टाकणार नव्हते, पण या घोषणेने  मना मनात हा भाव निर्माण झाला. 

युद्धामध्ये आपल्या सैनिकांच्या व साथीदारांच्या  मनमानत  असा स्फुल्लिंग, धग निर्माण करण्याची कृती सुद्धा सेनापतीला करणे गरजेचे असते.  

जगातील सगळे मोठे नेते आपल्या अनुयायांना जेव्हा जेव्हा आपल्या जनतेला अशाच प्रकारे छोटा मात्र सामूहिक कार्यक्रम  देताना दिसून येतात तेव्हा त्यामुळे साधला जाणारा परिणाम हा फार मोठा व महत्त्वाचा असतो हे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध करणारे विरोधक आणि बुद्धिवादी यांना बाजूला सारून आज संध्याकाळी आपण सर्वांनी आपल्या घरी रात्री नऊ वाजता दिवे लावून देशाच्या कोट्यावधी नागरिकांसोबत भावनेच्या एका समान पातळीवर येऊन माननीय पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्यासोबत कोरोनाच्या विरुद्ध लढायला सज्ज होऊया.
भारतावरच नव्हे तर समस्त जगातील मानवजातीवर आलेल्या कोरोना नावाच्या संकटाशी लढण्यात आपणा सर्वांना यश येवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. 

  • नितिन राजवैद्य. 

नितीन राजवैद्य

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Comments (8)
Add Comment
  • Rahul

    नक्कीच….. pm ने जे सांगितले मी सद्देव बांधील राहील

  • सपना राऊत

    लावायचे का ?हा प्रश्न नकोच मुळी… लवायचेच ही जिद्द हवी?

  • सपना राऊत

    लावायचे का हा प्रश्न नकोच मुळी…. लवायचेच ही जिद्द हवी

  • Pradip

    Must…..bhau…

  • सचिन

    हो नक्की

  • Ankush Kulkarni

    काका खुप छान लेख आहे हा. आणि लेख मध्ये सांगितलेला उद्देश खुप छान आणि तार्किक दृष्टीने लक्षात येण्या सारखं आहे.
    त्यामुळे मी रात्री 9 वाजता दिवे लावणार.
    From :
    Ankush Kulkarni
    Akola.

  • Sunil pasari

    नितिन जी आपकी लेखन कूशलता देखकर मन प्रसन्न हो गया। भगवान सेआपकी योग्यता और बढाऐ ऐसी प्रार्थना करते हैं.

  • Vipul Omprakash Sharma

    Great article and inspire to people thanks dada……