राष्ट्रऋषी अटलजी !

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी जयंती विशेष.

राष्ट्रऋषी अटलजी !

भारतीय राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी.
आपल्या पन्नास वर्षाच्या सामाजिक व राजकीय जीवनातील व्रतस्थ कारकिर्दीत स्व.अटलजींनी आदर्श कार्यकर्ता व आदर्श नेता म्हणून स्वतःला निर्माण केले. राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे अटल बिहारी वाजपेयी असे बोलल्या जाते.   संपूर्ण देशात काँग्रेसी विचारसरणीच्या विरोधात मोठे आंदोलन उभे करण्यात आणि देशात भाजपा च्या रूपाने काँग्रेस ला सक्षम राजकीय पर्याय उभा करण्यात अटलजींचे मोठे योगदान आहे. अटलजी तीनवेळा भारताचे पंतप्रधान राहिले. त्यांच्या कारकिर्दीतील इतिहासात नोंदवल्या गेलेल्या काही प्रमुख घटना पाहूया.

पोखरणमध्ये भारताची अणुचाचणी.
१९९८ साली पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने राजस्थानच्या पोखरणमध्ये अणुचाचणी करून जगाला आश्चर्यचकित केले. या अचानक झालेल्या अणुचाचणीमुळे अमेरिका आणि पाकिस्तानसह अनेक देश दंग झाले. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या अध्यक्षतेखाली हे अभियान अमेरिकेसह संपूर्ण जगालासुद्धा लक्षात येऊ नये अशा प्रकारे केले गेले.

कारगिल युद्धाचा विजय.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात भारताने कारगिल युद्ध जिंकले आणि जगासमोर हा संदेश दिला की भारत झुकणारा देश नाही. देशात एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले. अटल सरकारने कारगिल हुतात्म्यांना भरपाई जाहीर केली. तसेच शहीद सैनिकांचा अंतिम संस्कार सार्वजनिक ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला. या गोष्टींमुळे आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण झाला. तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलावून सैन्य मागे घेण्याचे आदेश दिले.

सुवर्ण चतुर्भुज आणि ग्रामीण रस्ते योजना.

महत्वाकांक्षी रस्ते प्रकल्प, सुवर्ण चतुर्भुज आणि पंतप्रधान ग्राम सडक योजना ही वाजपेयी यांच्या सर्वात मोठ्या कामगिरीपैकी एक आहे. सुवर्ण चतुर्भुज योजनेने चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि मुंबई यांना महामार्गाच्या जाळ्याशी जोडले, तर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून गावे पक्के रस्त्यांद्वारे शहरांशी जोडली गेली. स्वातंत्र्या नंतर प्रथमच भारतात रस्ते निर्माणच कार्य तेव्हा झाले.

सर्व शिक्षा अभियान.
अटल बिहारी सरकारच्या काळात २००१ मध्ये हे अभियान सुरू झाले. निराक्षरांना साक्षर करण्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात देशात हे अभियान राबविल्या गेले तसेच या योजनेंतर्गत ६ ते १४ वर्षाच्या मुलांना मोफत शिक्षण दिले गेले. या महत्वाकांक्षी योजनेमुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आणि साक्षरतेचे सुद्धा.

दूरसंचार क्षेत्रात क्रांती.

वाजपेयी सरकारनेच आपल्या नवीन टेलिकॉम पॉलिसीअंतर्गत टेलिकॉम कंपन्यांसाठी निश्चित परवाना शुल्क आणले आणि महसूल वाटून घेण्याची व्यवस्था आणली. धोरण तयार करण्यासाठी आणि सेवेत प्रवेश वेगळे करण्यासाठी भारत संचार निगमची स्थापनाही याच काळात झाली. वाजपेयी यांच्या सरकारने आंतरराष्ट्रीय दूरध्वनीमध्ये परदेशी संपर्क महामंडळाची मर्यादित मक्तेदारी पूर्णपणे रद्द केली.

अटलजींनी माँ भारती करिता केलेल्या सेवेचे स्मरण करत त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्व व पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.!

नितीन राजवैद्य

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Comments (1)
Add Comment
  • श्रीकांत पांडे

    अतीशय ऊत्तम माहीती आहे नितीन जी