सूर्याचे एक नाव भारत सुद्धा ….

सूर्याचे एक नाव भारत सुद्धा ….

आज देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहेत याचे आपण साक्षी आहोतच… स्वातंत्र्याचा संघर्ष झाल्यावर आज अमृत महोत्सव आपण साजरा करत असताना भारत जो धगधगत्या ज्वलंत ज्वाले सारखा धगधगत आहे. याचे रहस्य अनेक वर्षापूर्वी आपल्या प्राचीन साहित्याने दिलेल्या राष्ट्र संकल्पनेत दडलेले आहे.

अनेक दशकांपासून राष्ट्र संकल्पनेला युरोपीय देशांनी व्यक्तीस्वतंत्र आणि राष्ट्र परिभाषेला सिमित केले आहे.
प्राचीन भारतात सुद्धा स्वतंत्रता मर्यादेत बांधलेली होती. परंतु मर्यादा प्रेमी भारतीय पूर्ण स्वातंत्र्याची अनुभूती घेत होते. परमार्थ साधण्यासाठी स्वीकारलेल्या मर्यादेमुळे स्वातंत्र्य बाधित होत नसते. हाच विचार प्राचीन भारतीयांनी जगाला दिला. आणि यालाच भारतीय लोक मोक्ष म्हणून संबोधित असत.
मोक्ष म्हणजेच सर्व प्रकारच्या दुःखाची अत्यंत समाप्ती आहे.

मग प्रश्न असा उपस्थित होतो की प्राचीन भारतीयांनी मानवतेला विभाजित करणारी राष्ट्र संकल्पना का तयार केली असावी ?
याचे कारण असे की आत्मौधारासाठी मोक्ष हि एक तपस्या आहे, आणि राष्ट्र त्याची तपोभूमी आहे.
महत्वाचे म्हणजे शरीर आणि राष्ट्र हे आत्मौधारासाठी आवश्यक असलेले सर्वात महत्त्वाचे साधन आहे.
पाश्चिमात्य देशांनी आज विश्वाचे जागतिक भुमंडलीकरण ज्या अर्थी केले आहे. तो मार्ग देशभक्तीचा जरी वाटत असेल परंतु त्यात देशभक्तीचा फक्त उन्माद दिसतोय, कारण देशभक्तीत देशाला फक्त जमिनीचा एक तुकडा म्हणून गृहीत धरून चालत नाही, तर देशाला एक जिवंत पुरुषा प्रमाणे आणि मायेच्या वात्सल्याने पुजावे लागते. आणि तीच राष्ट्रभक्ती काय असते हे जगाला भारताने त्या सुवर्ण काळात सांगितले ज्या काळात इग्लंड, फ्रान्स, स्पेन आणि पोर्तुगाल सारखे देश उदयास सुध्दा आलेले नव्हते.
आपली राष्ट्र परिभाषा फक्त भौतिक भूमी पर्यंत मर्यादित नसून आपल्यासाठी राष्ट्र म्हणजे एक जिवंत पुरुष आहे भूमी त्याचे शरीर आहे ,लोक त्याचे प्राण आहेत आणि संस्कृती हे राष्ट्राचे मन आहे. प्राचीन भारतीयांची दृष्टी आज सारखी खंडित नव्हती ते जीवनातील भौतिक, दैविक आणि आध्यात्मिक स्वरूपाला एक समान दृष्टीने बघण्याचे सामर्थ्य ठेवत असत. म्हणूनच राष्ट्र आणि राष्ट्रभक्ती हे राष्ट्रभक्त आणि राष्ट्रपासून विभक्त होऊ शकत नाही हा त्यांचा दृष्टिकोन होता. आणि हेच आज आपण स्मरण करण्याचे कुठेतरी विसरतो आहोत.
भारत भूमी केवळ भौतिक परमाणूने निर्माण झाली नसून या भूमीत एक चेतन प्राण प्रणाली आहे, ती कुंडली शक्ती प्रमाणे चंचल आहे.
ज्या प्रमाणे शरीरात कुंडली शक्तीला साधून कुंडलिनी मुलाधार चक्रा पासून सर्प मार्गाने मर्गांतर करून सहस्त्रार चक्रा पर्यंत पोहोचते, आणि नंतरच सर्वयोग धारण करते.
त्याच प्रमाणे भारतातली शेवटचे टोक असणाऱ्या कन्याकुमारीला मुलाधार चक्राची सज्ञा दिली गेली आहे. आणि ह्याच चक्रा पासून उत्तरेत असणाऱ्या कैलाश पर्वताला सहस्त्रार चक्राची सज्ञा दिली गेली आहे या दोन चक्रा दरम्यान होणाऱ्या भौतिक भक्तीलाच आपण राष्ट्रभक्ती म्हणून संबोधित करू शकतो. आणि राष्ट्रभक्ती म्हणजेच कन्याकुमारी पासून तर कैलाश पर्यंत सर्प मार्गाने मार्गक्रमण करणे म्हणजेच एक एक तीर्थ क्षेत्राला साधत जाणे. अंततः कैलाशात विराज आदीयोगी स्वरूपाला म्हणजेच राष्ट्राच्या विश्व गुरुत्वाला प्राप्त करणे होय.
ज्याप्रमाणे शरीरात इडा,पिंगा आणि सुषुम्ना वाहत आहे. त्याचप्रमाणे भारतात देखील गंगा , यमुना आणि सरस्वती सतत वाहत असून राष्ट्र एक जिवंत पुरुष आहे याची जाणीव राष्ट्राचे भौतिक स्वरूप बघून होत आहे. भारतीय योगी पुरुषांनी नेहमीच राष्ट्रात शरीर शोधले, शरीर आणि अंतःकरण मिळूनच राष्ट्राचा समाज तयार होतो. आणि ह्याच शरीराचा 1947 ला विभाजन करून तत्कालीन स्वार्थी राजकारनाने राष्ट्रचेतनेवर आत्मघात केला गेला… जेव्हा जेव्हा समाज हा राष्ट्रभक्तीच्या विपरीत निद्रेत मदमस्त असतो तेव्हा राष्ट्राचा घातच होतो.

मंगोल आक्रमणा पूर्वी झालेले हून आक्रमण अतिशय भयावह होते राष्ट्राचा आत्म्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला. या आक्रमणाला रोखण्यासाठी गुप्त सम्राट बलादित्याने आपली सर्वशक्ती सर्वस्वला लावली आणि अखेर युद्ध जिंकले परंतु समाजाचा उद्धार करणे अंतिम लक्ष नसून आत्मौधार करणे महत्वाचे आहे. ह्याची जाणीव बलादित्याला होती म्हणूनच प्रंचड सत्ता आणि राज्याचा त्याग करून राजाने सन्यासत्व स्वीकारले, हेच भारतीय संस्कृतीची शिकवण आहे.
आत्मौधार जरी अंतिम शाश्वत असेल तरी सुद्धा राष्ट्रभक्तीचा भाव सुद्धा भक्ती मार्गच आहे.आधुनिक युगात राष्ट्रभक्तीला patriotism म्हणून संबोधले जाते परंतु भारताच्या राष्ट्रभक्तीला patriotism जर समजत असाल तर भारत अजून सुद्धा आपल्याला कळला नाही. भक्ती मधे भक्त आणि ईश्वर एकच होऊन जातात ते विभक्त नसतात. मात्र आधुनिक patriotism मधे भक्ती आणि भक्त याचे स्वरूप बदलून जाते त्यामुळे हि संकलपणा भारतासाठी मुळीच नाही.

अग्निचे एक नाव भारत सुद्धा ….
कारण जिथे भारत-जन निवास करतात तेथे अग्निचा वास असतो. प्राचीन भारतात अग्निला विजवत नव्हते कारण अग्निला चेतना म्हणतात. आणि चेतना चिरायू आहे , ती अविरत आहे. तसेच राष्ट्रासाठी “राष्ट्रभक्ती” अग्निरूपी चेतना आहे. तिचे सतत स्मरण करावे लागेलच ,अग्नी जशी एका राष्ट्राची नसून ती विश्वाची आहे तसेच भारत सुद्धा एका समाजासाठी नसून संपूर्ण मानवजातीसाठी अग्नि सारखा चेतनस्वरुपी कल्याणकारी आहे…म्हणुच वेदांमध्ये भारत देशाला सूर्य नारायण सुद्धा म्हटले. भारत हा सूर्यासारख प्रखर आहे , त्याला काही काळासाठी असुरी शक्तीचे ग्रहण लागू शकते. पण त्याला निस्तेज करता येत नाही.तो पुन्हा आकाशात चमकून दिसणारा आहे. कारण त्याचा स्वभावच प्रकाश देण्याचा आहे … ज्ञानाचा प्रकाश

भारतीय संस्कृतीने देशभक्ती आणि प्रभुभक्तीला विभक्त समजले नाही, हिच भारतीय संस्कृतीची महानता आहे. रामभक्त रवींद्रनाथ याचे उत्तम उदाहरण आहेत .
जेव्हा राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोरांनी लिहिले तेव्हा त्यांनी प्रभू रामचंद्रांचे स्मरण केले. रामायणातील श्लोकांचा अभ्यास करून राष्ट्रगीत लिहिले त्यातील काही
राष्ट्रगीता मधील ओळ वाचून आपल्याला कल्पना येईल …
” द्राविड़ उत्कल बंग।। विंध्य हिमाचल यमुना गंगा।
उच्छल जलध्तिरंगा।।”
वरील राष्ट्रगीतातील ओळ रामायणाच्या एका श्लोकातून आपल्या घेतलेली दिसते. श्लोक खालील प्रमाणे आहे.
“द्राविडाः सिन्धुसौवीराः सौराष्ट्रा दक्षिणापथाः । वडगाङमगधा मत्स्याः समृद्धाः काशिकोसलाः ।।”
काही पुरोगामी राष्ट्रभक्ती आणि देवभक्ती कशी एकमेकांपासून अलिप्त आहे. असे सांगण्याचे प्रयत्न करतात आहे. मात्र त्यांच्या साठी वरील उदाहरण पुरेसे आहे . तसेच विर सावरकर सुद्धा म्हणलेच की “देहापासून देवाकडे जातांना मधे देश लागतो” या वाक्यात अत्यंत सात्विक सत्यता दडलेली आहे. आणि हेच आज भारतमाता तिच्या १४० करोड भारतीय पुत्रांना कळकळून सांगतेय…

आज अमृतमहोत्सव साजरा होतोय येत्या काळात सुवर्ण महोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. परंतु भारत अनंत आहे ,भारत अनादी आहे. आणि भारत अवध्य सुद्धा आहे. भारत हि प्रकृतीची उत्तम रचना आहे. विश्वाला शोभेल असा गुरू भारत आहे. याची जाणीव आपल्याला नक्कीच असावी अशी अपेक्षा करतो.

सर्वांना 76 व्या स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..

भारत माता की जय…!

– संकेत राव✍️

image – Google.

संकेत राव

लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत. समाजातील वाईट प्रथा आणि गौरवशाली इतिहास तसेच इस्लाम धर्माचे अभ्यासक आहेत.

Comments (0)
Add Comment