विलगीकरणाचा उगम एक शोध

विलगीकरणाचा उगम एक शोध

आज कोरोनाच्या विळख्यात संपूर्ण विश्व सापडले आहे. रोज हजारो नागरीक या विषाणूच्या संसर्गात येत आहेत. या विषाणूमुळे कित्येक लोक रोज प्राणास मुकत आहेत. आजच्या आधुनिक काळात एवढ्या प्रगत वैद्यकीय सोयीसुविधा असताना सुध्दा या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विलगीकरण हा एकच उपाय सुचवला जात आहे. विलगीकरण करण्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी रोखता येत आहे आता हे सिद्ध झाले आहे.

आपले पंतप्रधान व प्रशासन मागील कित्येक दिवसापासून संपूर्ण हिंदुस्थानला विनंती करत आहेत कि समाज अंतर(Social Distance) पाळा जेणेकरून या विषाणूचा प्रसार रोखता येईल. पण आपल्या समाजातील काही घटकांनी व समाजकंटकांनी अनेकदा विनंती करून सुद्धा त्याचे पालन केले नाही आणि आज करोनाचा हिंदुस्थानचा प्रवास एक वेगळ्या वाटेवर येऊन थांबला आहे. आपल्याला आता संपूर्ण बंदीला( Total lockdown ) सामोरे जावे लागत आहे. ज्यांना या कोरोना विषाणूची लागण झाली आहे त्यांना विलागीकरण कक्षात (Quarantine ward ) ठेऊन उपचार करण्यात येत आहेत. जे नागरिक या संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले आहे त्यांचे विलगीकरण(Quarantine) करण्यात येत आहे. आज हिंदुस्थानच्या प्रत्येक नागरिकांस समाज अंतर (Social Distance), संपूर्ण बंदी( Total lockdown ), विलगीकरण(Quarantine) हे शब्द जणू अंगवळणी पडले आहेत. पुढील कित्येक दशके सगळे विश्व हे शब्द कदापिही विसरणार नाही.

समाज अंतर ,विलगीकरण, संपूर्णबंदी हे शब्द आणि उपाय आत्ताच आले का या अगोदर आपल्या पूर्वजांनी कधी या उपचार पद्धतीचा विचार आणि वापर तरी केला असेल का? अशी महाभयंकर महामारी जर समाजात पसरू लागली तर आपल्या पूर्वजांनी याचा सामना नक्की कसा केला असेल? कोणते उपाय योजिले असतील? त्यासाठी या उपचार पद्धतीचे नियम किवां मार्गदर्शक तत्वे कोणी तयार केली असतील का? हा गहन प्रश्न हिंदुस्थानातील प्रत्येक नागरिकास पडल्याशिवाय राहणार नाही.

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर आपल्याला खूप मागे वळून पहावे लागेल अगदी हिंदू धर्मातील वेदांपर्यंत. विलगीकरणाचा मानवजातीच्या इतिहासातील पहिला उल्लेख हा आयुर्वेदीय प्राचीन ग्रंथापैकी दुसरा महत्वाचा ग्रंथ “सुश्रुतसंहिता” या ग्रंथात आढळतो. हा महान ग्रंथ महर्षी सुश्रुत यांनी लिहिला. महर्षी सुश्रुत हे वेदकाळातील विख्यात ऋषी विश्वामित्र यांचे पुत्र. महर्षी सुश्रुत यांचा जन्म बनारस या ठिकाणी झाला. सुश्रुतसंहितेला हिंदुस्थानी चिकित्सा पद्धतीमध्ये एक महत्वाचे स्थान आहे. या प्राचीन संस्कृत ग्रंथाचा आठव्या शतकात अरबी भाषेत “किताब-ए-सुश्रुत” या नावाने अनुवाद सुद्धा करण्यात आला आहे.

सुश्रुतसंहितेमधे एकूण १८४ अध्याय आहेत. यामधे रोगासंबंधी लक्षणे, जंतू स्रोत त्यावरील उपाय, रोग बरे करण्यासाठी लागणाऱ्या औषधी वनस्पती आणि त्यावर आधारित शल्यक्रिया यांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने आठ प्रकारच्या शल्य चिकित्सा(operations) यांचा उल्लेख आढळतो. या ग्रंथात शल्यचिकित्सा करण्याबाबत आवश्यक यंत्रे व उपकरणे यांचा विस्तृतपणे उल्लेख केला आहे. या ग्रंथात मानवी शरीराचे प्रत्येक अंग व त्यावरील शस्त्रक्रिया यांचा सखोलपणे केलेला अभ्यास आढळतो. आश्चर्याची बाब म्हणजे आजच्या आधुनिक काळातील मानवी शरीराचा अभ्यास आणि मानवाला होणारे आजार आणि उपलब्ध शस्त्रक्रिया त्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे आणि सुश्रुतसंहितेमधे वर्णन केलेली आजाराची लक्षणे त्यावर सुचवलेली निदाने आणि शल्यकर्म उपाय त्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे हे अगदी तंतोतंत जुळतात.

सुश्रुतसंहिता म्हणजे केवळ शल्यकर्म(operations) अशी अनेकांची समजूत आहे. शल्यकर्मातील सुश्रुताचे काम जगविख्यात डॉक्टरांनी मान्य केले आहे. सुश्रुत हा सर्जरीचा जनक म्हणून ओळखला जातो. या ग्रंथाचे फक्त एवढेच वैशिठ्य नाही तर त्याने समाजात जर महामारी किंवा साथीसारखी परिस्थिती निर्माण झाली तर अश्या परिस्थितीमधे साथीचे रोग टाळण्यासाठी नक्की कोणते उपाय करायचे कोणते नियम पाळायचे याचे सविस्तर वर्णन या ग्रंथात केले आहे.

या ग्रंथाच्या चवथे स्थान “चकित्सास्थान” याचा चोविसावा अध्याय “अनागाताबाध प्रतिषेध चिकित्सा” यामधे हे वर्णन आढळते. या अध्यायात समाजात पसरलेल्या साथीचे रोग किंवा भविष्यात पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कसा कमी करायचा आणि स्वच्छतेसंबंधी कोणते नियम पाळायचे याची माहिती विस्तृतपणे दिली आहे. यामधे प्रामुख्याने शरीराची स्वच्छता कशी राखावी व आचारांचे सामान्य नियम कसे असावेत याचे संदर्भ आढळतात.
आचारांचे सामान्य नियम याबद्दल सुश्रुत लिहितो
• नखे आणि केस कापलेले असावेत,स्वच्छ कपडे घालावेत.
• बोलताना सद्वर्तनी असावे आणि सर्व प्राणीमात्रांबद्दल दयाळू असावे.
• अज्ञात ठिकाणी गुहेत तसेच समुद्रात किंवा नदीकाठी जाऊ नये.
• वाळवंट , स्मशानभूमी, एकटी वने येथे जाणे काटेकोरपणे टाळावे.
• जिथे रस्ते ओलांडतात तेथे जाऊ नये किंवा बुरशी, राख, हाडे, केस, दगड, भाजलेली पृथ्वी आणि कोळशाचे ढीगांनी झाकलेल्या जागांवर जाऊ नये या जागा अपवित्र मानल्या जातात.
• नागरिकांनी कधीही राजाची चेष्टा करु नये, किंवा कठोर आणि खोटे बोलू नये किंवा फसवणूक करू नये म्हणजेच अफवा पसरवू नयेत.
• उगीचच सार्वजनिक ठिकाणी किंवा मैदानात जंगलात व डोंगरदऱ्यांत फिरू नये.
• झाडे, पर्वत, डोंगर चढणे, धबधब्यावर जाणे तसेच घोडा किंवा हत्ती चालविणे यासाठी सक्त मनाई आहे.
• वन्यप्राणी, आग, साप आणि विषारी कीटकांसह, जंगली पशू, कीटक, सरडे आणि शिंगे असलेले प्राणी तसेच कोठे विषाणूजन्य साथीचे रोग निर्माण झाले आहेत तिथे जाणे टाळणे व व संसर्ग झाला आहे त्याठिकाणी कोणाच्या संपर्कात येऊ नये.
• अनावश्यकपणे जमिन ओरखडू नये, आणि जांभई देऊ नये
किंवा शिंकू, नये चेहरा कपड्याने पूर्ण झाकलेला असावा.
• वैद्याने सांगितलेले अन्न ग्रहण करावे, आहार सात्विक असावा व ठरवून देलेल्या वेळीच व सांगितलेल्या प्रमाणातच ग्रहण करावा.
• आजारी पडणाऱ्यांच्या व्यक्ती, गाय, दैवी प्रतिमा,यांची सावली किंवा स्मशानभूमीवर वाढणारी झाडे यावर पाय ठेवू नये.
• उगवणाऱ्यां किंवा सूर्यास्ताच्या सूर्याकडे पाहू नये. कोणीही आग लावू नये, जमिनीवर किंवा पाण्यावर हातपाय मारू नये.
• माणसाने कोणत्याही नैसर्गिक इच्छेची दडपशाही करू नये. मोकळ्या जागी किंवा सार्वजनिक ठिकाणी गावच्या हद्दीत किंवा स्मशानभूमीच्या जवळ किंवा कोणतेही पूजास्थान, जलाशयांमध्ये मुत्र किंवा मलविसर्जन करू नये.

आता आपण करोना विषाणू ज्या प्रकारे जगात पसरत आहे आणि तो रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेली मार्गदर्शक तत्वे आपल्या पंतप्रधान यांनी समाज अंतर व लॉकडाऊन पाळण्यासाठी केलेली विंनती व आपल्यावर संपूर्ण हिंदुस्थांनात प्रशासनाने लागू केलाली संचारबंदी याची तुलना सुश्रुतसंहितेमधील सुचवलेल्या आचारांचे सामान्य नियम याबरोबर केली तर आपणास असे जाणवेल हे सगळे सुचवलेले उपाय आणि रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लागू केलेला संचारबंदी कायदा या सगळ्या गोष्टी तर सुश्रुतसंहितेमधे कित्येक हजार वर्षापूर्वी संगितेल्या आहेत. करोना सारखी महामारी आली तर त्याचा प्रसार कसा रोखायचा याचे उत्तर देखील आपल्या पूर्वजांनी कित्येक शतके अगोदरच लिहून ठेवले आहे. विलगीकरणं, समाज अंतर, संचारबंदी याबाबत नियम अतिशय स्पष्ट आणि विस्तृतपणे सुश्रुतसंहितेमधे लिहले आहेत. आजच्या आधुनिक काळात हे नियम अगदी तंतोतत लागू पडत आहेत.

यावरून पुन्हा: एकदा सिद्ध होत आहे कि प्राचीन हिंदुस्थांनामधील परंपरा त्यामधे अभिप्रेत असलेली जीवन शैली , रितीरिवाज यांच्यामागे निश्चित शास्त्रीय आधार आहे. सांगितेल्या तत्वांना वैद्यानिक दृष्टीकोन आहे. हिंदू धर्मार्तील चालीरीती आजही आपण जर अंगिकारल्या तर आपण निश्तितच करोना सारख्या विषाणूचा सहज मुकाबला करून विलगीकरनातून सामान्य जीवन लवकर पूर्वपदावर आणू शकतो. हिंदुस्थांनातील प्राचीन जीवनशैली जगाने अंगिकारली तर हिंदुस्थान नक्कीच पुन्हा विश्वगुरु होऊ शकतो यात कोणाचेही दुमत नसावे.

नंदकुमार शरद घोडके

लेखक हे पुणे महाराष्ट्र येथील रहिवासी असून, हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास, शैक्षणिक, सामाजिक, सहकार, शेती व माहिती तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक आहेत.

Comments (3)
Add Comment
  • Ranjeet Bhelke

    घोडके साहेब, फारच अभ्यास पूर्ण लेख आहे. अतिशय मौलिक माहिती मिळाली आज. मनःपूर्वक धन्यवाद आणि दुसर्‍या लेखा बद्दल अभिनंदन.

  • Milind

    Well brought out connection with our Sanatan Dharma. Very well written article

  • मनोज प्रभाकर जोशी

    अभिनंदन घोडके साहेब, अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. भारतीय प्राचीन ग्रंथातील महत्वपूर्ण माहिती मिळाली.