भारत मातेचे थोर सुपुत्र संयुक्तसैन्याधिकारी श्री बिपिन रावत.

0 309
न भरून निघणारी भारताची हानी.
आपण भुदल सैन्याधिकारी असतांना व नंतर संयुक्त सैन्यदलांचे प्रमुख झाले असतांना आपल्या देहबोलीने आपण शत्रूचा थरकाप उडवला होता. प्रत्यक्ष सीमाक्षेत्रात जावून शत्रूला धडकी भरणारी आपली डरकाळी  केवळ सैन्याचेच नव्हे, तर आम्हा सामान्य नागरिकांचेही मनोधैर्य वाढवणारी होती.
सैन्याच्या प्रत्येक शिपायाई लढवण्यासाठी आसुसलेला असतो. या युद्धोत्सुक हातांमध्ये बंदुक देऊन त्यांचे हात बांधलेले असत. त्यामुळे देशाच्या सीमांची व देशांतर्गत सुरक्षा हा दुय्यम विषय ठरायचा. त्यामुळे सीमांवर घुसखोरी व नागरी क्षेत्रात बाॅम्बस्फोट, अशा घटना  नित्याच्या होत्या.
परंतु आपल्याला अशा सत्ताधाऱ्यांसोबत काम करायला मिळाले, जे देशहितास्तव कुठलीही तडजोड करायला तयार नाहीत. उलटपक्षी देशहितास्तव जे आक्रमक होतात. त्यामुळे आम्ही जनता आपणास आजवरचा सर्वात भाग्यवान सेनाधिकारी समजत होतो. शत्रूच्या गोटात घुसून त्यांची आतंकवादी प्रशिक्षण केंद्रे नष्टकरून आपण आमची ही समज खरी ठरवली होती.
आजवर पाकिस्थान ला दम भरणारे अनेकजण आम्ही पाहिले होते. तसा कमजोर पाकिस्तान हा साॅफ्ट टार्गेटच आहे म्हणा. पण चीन ला धमकावणारा व सीमेवरून त्याला माघारी हाकलणारा म्हणून आपण मात्र आमच्या गळ्यातील ताईत झाले आहात. आपल्या या सर्व कर्तृत्वाने आपण सैन्याधिकारी म्हणून निवृत्त होतांना आपल्या या गुणांचा सत्कार म्हणून आपल्याला भुदल, नौदल व सेनादलाचे संयुक्त प्रमुखपद दिल्या गेले होते. हे पद भुषवणारे आपण पहिलेच व्यक्ती आहात. पाकिस्तान व चीन च्या कुरापती बघता आपल्या नेतृत्वात या दोघांनाही जरब बसावी अशी युद्धसाहित्याची मजबूत बांधणी आपण सीमांवर केली आहे. अशा स्थितीत युद्ध झालेच तर आपल्या माध्यमातून तिनही दलांचा आपसात समन्वय राहून  या तिनही माध्यमातून योग्य निती अवलंबून मारा केला गेला असता व शत्रूला नेस्तनाबूत करुनच दम घेतला असता.
नियती मात्र नेहमी वेगळाच खेळ खेळत असते. सीमावर्ती व देशांतर्गत स्थैर्य असण्याच्या काळात नेमका कुठाराघात झाला. त्याची हानी किती प्रमाणात राहील आम्ही सामान्य जनता सांगू शकत नाही. पण शत्रूकडे बंदूक, तोफा, मिसाईल रोखण्या आधीच आपला हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
भारत भूमी ही वीरप्रसवणी आहे.  इथे वीरांची कमतरता नाही, पण तरीही आघाडीवर लढणारा सैन्याधिकारी असा जावा, हे धक्कादायकच आहे.
एक सामान्य नागरिक म्हणून मी माझ्या दिवंगत सैन्याधिकाऱ्याला, देशाला सशक्त राष्ट्रांच्या रांगेत बसवणाऱ्या सच्च्या सैनिकाला  सॅल्युट करतो. या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या सर्वाना भावपूर्ण श्रद्धांजली.!

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Leave A Reply

Your email address will not be published.