मनाची काजळी दूर करणारी दिवे लागण !

1 509

तिन्हीसांजा झाल्या , दिवा लावला की हात-पाय धुवून घरातील मोठ्यांबरोबर लहानांनीसुद्धा देवासमोर बसावे.दिव्याला नमस्कार करून शुभंम करोति ,रामरक्षा ,भीमरुपी,मनाचे श्लोक म्हणायचे हे घरोघरी पूर्वी नित्यनेमाने दिसणारे चित्र आता पुसट झालयं.
हे सगळ आठवण्याचे कारण म्हणजे करोनामुळे सगळं ठप्प झालयं….तेव्हा एकूणच कामाची धावपळ कमी झाल्याने नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ वाचनाला देता येतोय.नुकतचं प्रा.प्रवीण दवणे यांचे ‘मुक्तछंद ‘वाचून संपवले, त्या मधील ‘प्रार्थनेतलं महन्मधुर काव्य !’हा लेख करोनाच्या या संकटकाळात मनाला अगदी स्पर्शून गेला..काहीतरी मागे सुटतयं, हरवतयं ते काय याची लख्ख जाणीव झाली आणि मनात रेंगाळली ती बालपणीची ‘मनातली काजळी दूर करणारी तिन्हीसांजेची दिवेलागण !’
त्या अजाण वयात त्या श्लोकांचा अर्थ कळत नसला तरी त्यामधून अपूर्व मनःशांती मिळत असे.आता मात्र कळते पण वळत नाही अशी स्थिती आहे. आजकाल आजी-आजोबा घरात नसतात,आई-वडील दोघेही working असल्याने वेळेचा अभाव ,एकूणच रोजची धांदल या सबबींमुळे बहुतेक घरांमधे नित्यपाठाला रजा दिलीय.त्याचे महत्त्व पटत असलं तरी त्यात सातत्य उरले नाही.रोज म्हणण्याने सातत्य येते आणि या सातत्यातूनच परंपरा,संस्कृती व संस्कार रुजत असतात.

सध्या करोनामुळे मुंबई-पुणे ही माणसांनी भरलेली शहरं ओस पडलीत,गेल्या काही दिवसांपासून आपण घरी आहोत T.V. ,mobile, पुस्तकं आणि जवळची माणसे सोबतीला असुनही कंटाळा आलाय…खबरदारी म्हणून अजून बरेच दिवस घरात बसावे लागणारचं…’काही होत नाही बाहेर फिरल्याने ‘
हा अतिशहाणपणाच युरोपिय देशांना नडलायं….करोनाविषयी updates बघायला हवेत पण दिवसभर चर्चासत्राचा अतिरेकही नकोच.शेवटी कायतर.. अति सर्वत्र वर्जयेत | असो. पण घरात अजून किती दिवस अडकून बसणार,कधी संपणार हे सगळं, रूग्णांची वाढती संख्या व होणारे मृत्यू ,युरोपिय देशांची दुरावस्था व त्यातुन सतत वाटणारी भीती व धास्ती या सगळयातून सारखा येतोय एक प्रकारचा ‘mental sickness ‘आणि ‘negativity’..
नेमक्या ह्याच वेळी
प्रार्थनेचं सामर्थ्य अधिक गहीरे होऊन जाणवतय कारण हा ‘mental sickness’ येऊच नये म्हणून प्रार्थना counseling चे काम पूर्वीपासूनच करत आहेत.जीवनातला काळ कधी सुकर असेल तर कधी कठीणही असेल.दुष्काळ ,महापूर,महामारी इ.संकटे येतातआणि जातात… ही जगरहाटी चालतं राहणार .
पण कठीण काळात मनात आशा,आत्मविश्वास,धैर्य , सामर्थ्य टिकवून ठेवतं ते हेच -प्रार्थानेचं सुंदर रसायन! आणि (प्रा .दवणेंचा लेख वाचल्यावर) तीव्रपणे वाटून गेले आजपासून फक्त देवघरातच नाही तर मनातही दिवेलागण व्हावी.

(चित्र आंतरजालावरून साभार)

1 Comment
  1. विश्वास देशपांडे says

    खूप छान लिहिलंय प्रार्थनेचं महत्त्व…

    – विश्वास देशपांडे

Leave A Reply

Your email address will not be published.